Saturday, June 30, 2007

ओरखडा

हिरवी फान्दी
उमलत्या कळ्या
फान्दीवर उरलेला
एखादाच काटा..!

शब्दही असेच कधी
डवरतात...
...बहरतात
पडतात सडा होउन..किन्वा
नुसतेच सलतात!
तेव्हा...
कुठून तरी एक
हळवी दाद...
समजाव
मोहरण, बहरण
कुणीतरी टिपलय!

झेललाय कुणीतरी
...काळजावर सडा
निदान...
..एखादा ओरखडा!!!

तु

मी कधीच म्हटले नाही तुला,
तुही हो माझ्यासारखच..
माझ्यासाठी हळव.....
मी कधीही म्हणणारही नाही तूला
तुही हो त्रुषार्थ
माझ्यासारखा....
कारण हजारात एखादाच होउ शकतो
खरा चातक....!
नाही तर काही आगन्तुक पक्षीही
असतातच ना
प्रत्येक वसन्तात येणारे....
नी शिशीरात सोडुन विखुरणारे
आकाशभर........!!!

श्रद्धा.....

काल रात्री गंमत झाली, Breaking News परत आली.
तर्काच्या ऐवेजी अंधश्रद्धा नाचली, समुद्रावर ही.. गर्दी लोटली.

चमत्कार चमत्कार, पीर बाबाला नमस्कार,
बाबाची करणी, समुद्रात गोड पाणी.
सब रोगोंका एकही इलाज.....
लोक गाऊ लागली गाणी, पिऊन घाणेरड ते गटाराचे पाणी.
हीच आपली थोर संस्कृती, तरी थांबली आहे विकासाची गती.

आता विकास म्हणतात ते तरी काय?

कशा पाई करतात कष्ट? का बोलू मी स्पष्ट!!
मी स्पष्ट बोलून कुठच जग हलणार आहे,
दीड अब्जांच्या गोंगाटात लगेचच विरून जाणार आहे!
सर्व नाक डोळे मेंदू कान, झुकवितात केवळ अंधश्रद्धे साठी मान.
अशी श्रद्धा काय कामाची, जी घेऊन येई महामारी.
मला सगळे दिसते स्पष्ट, सर्व होणार आहे नक्किच नष्ट.

निसर्ग हा कृती अपेक्षितो, बलवान हा दुर्बलाला भक्षतो.
जगात बलवान किती, दुर्बल किती, मांडता येतील का आकडे?
सगळ्यात सोप्पे, व्हा मोकळे, घालून देवाला साकडे.

मुख्यमंत्री करतात महापूजा. घालून बारा अंगठ्या दहा बोटात.
चिंता नसते जनांची, तर नवीन वर्षात काय भरायला मिळेल पोटात.
या अंधश्रद्धेची वाटते मला लाज, अंगावर नसते चिंधी तरी चढवतात देवीवर साझ.

मुंबई-शांधाई, पुणे- बॉस्टन,
हे बोलणे केवळ मिठाईचे वेष्टण.
बिन्डोक जनतेला दाखवतात आतल्या मिठाईची लाच,
लावून IT Park ला भिंतभर काच.

त्या काचेपलिकडे दडली आहे वैचारिक कमकूवत,
असाध्य-साध्य कसे होईल, पाश्चात्य शैली अनुकरत!!
IT मधून आला पैसा, तळागाळात कसा पोचणार?
नवे मम्मी-डॅडी मुलांसोबत केवळ BIG Mac खाणार.

नव्या गाडीतून घरी जाता जाता, येई दत्त मंदिर आडवे,
गाडीतूनच "ओठ-कपाळ" करून गातात Indian cultural गोडवे.
लायकी तसे मिळते, अजूनही निम्मी जनता दोन घास कमीच गिळते.

उपाय काय?? वैतागून टेबलावर घट्ट मूठ आपटली,
बिचारी मुंगी त्याखाली सापडली.
मेल्या मुंगीने दिली कल्पना, चिरडून टाका त्यांना,
ज्यांना नाही फिकीर कोणाची, ना मनाची ना जनाची.
सुचून असली कल्पना, मी गालातल्या गालात हसलो,
काम सोडून या नव्या कुठल्या फंदात मी फसलो!!!!

समस्येचे कळले बहुतेक मला मूळ,
काळच ठरवेल, हे माझे ध्येय का माझे खूळ.
कामे करून घ्यायला, झिजवीन माझ्या बुटाची टाच,
तरी देणार नाही, एक दमडी देखिल मी कोणाला लाच!!!!!

---------------शिरीष माधव गानू

हरवलेला मी

स्वप्नील डोळ्यांची उघडझाप करत
जेव्हा तू बोलायचीस माझ्याशी
कान माझे चक्क फितूरी करायचे
मात्र डोळे होते प्रामाणिक माझ्याशी

अखंड उत्साही बडबड तुझी
कानावरुन जायची वाहून
पण निरागस आविर्भाव चेहेऱ्यावरचा
न्यायचा माझं मी पण पळवून

'असा काय रे बघतोस हरवल्यासारखा........'
तू म्हणायचीस नेहेमी
'अगं, मलाच शोधतोय तुझ्या डोळ्यात
सारखा हरवतो माझा मी'.

'तुझं आपलं काहीतरीच......'
तू टिंगल करायचीस माझी
पण ते लाजरं खळीतलं हसू तुझं
खरं खरं बोलायचं माझ्याशी

सूर्याचं अस्ताला घाईघाईने जाणं
अन तुझं गडबडीनं उठणं
रेंगाळलेली किरणं गोळा करत
माझं उद्याची वाट पहाणं

'येते रे' म्हणतानाची तुझी व्याकुळ नजर
ओढाळ पावलं अन ओली पापण्यांची झालर
पाठमोरी डोळ्यात साठवलेली तू
अन अजूनही हरवलेला मी
अन अजूनही हरवलेला मी

तू हवा..... तू हवा!

स्वप्नातील गोड भास
सत्यातील आस तू
हवीस तू.... हवीस तू

मोहक तू लडीवाळ
मिश्कील आणि खट्याळ
बोल तुझे किती मधाळ
सत्य असून स्वप्न तू
हवीस तू...हवीस तू

गझल तूच नटलेली
सूरात चिंब भिजलेली
हृदयातील श्वासांची
सूरेल एक तान तू
हवीस तू... हवीस तू

स्पर्श तुझा लाजरा
श्वास तुझा मोगरा
पाहूनी तुझ्या अदा
कूस बदलती ऋतू
हवीस तू... हवीस तू

Friday, June 22, 2007

खाली डोकं वर पाय

जेव्हा तिला वा असतं, तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं !
अशा क्षणी चष्मा पुसत, तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
जेव्हा ती लाजत म्हणते, "आज आपण पावसात जायचं"
याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं,
भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत,
भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास,
अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास,
तुम्ही म्हणता थांब जरा,
आणि होता लांब जरा,
तुम्ही चिंतन करीत म्हणता, "दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं,
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !"
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता,
व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

मन उधाण वाऱ्याचे

मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते...
आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहूरत्या सांजेला कधी एकटेच झुरते..
सावरते बावरते घडते अडखळते का पडते,
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते...
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते..
अन क्षणात फिरुनी आभाळाला भिडते..
मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे..
का होते बेभान कसे गहिवरते.................
रुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते,
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते..
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते..
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते..
जाणते तरी हे पुन्हा पुन्हा का चुकते..
भाबडे तरी भासांच्या मागून पळते..
मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे..
का होते बेभान कसे गहिवरते..................

पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबात

पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबात
सगळं जग एकवटून येत..
मनातली रडगाणी वाहून नेत,
नविन सूरातील तराणे गातं..
प्रत्येक थेंबात तेच पाणी, पावसाची तिच जूनी गाणी
पण शब्दाविना आकाशाशी आनंदाची देणी घेणी..
मनामधलं मळभ जणू धाव घेउन आभाळ गाठत,
अन नभातील इंद्रधनु परत मनात बस्तान थाटतं..
डोळ्यामधल पाणी सुद्धा वाहण आता विसरुन जातं,
जलधारांच्या वेगाबरोबर दुःख जणु ओसरुन जातं..
मातीच्या या सुवासासारखं दुसरं काही असत नाही,
कुपी मधल्या अत्तराला मन आता फ़संत नाही..
पावसाचे ते पाणी घराच्या छतावर
हळुवार आपटत असते,
आपल्यातल्या बावरलेल्या बाळाला जणु,
आई प्रेमाने थोपटत असते..

तुझ्याचसाठी

तुझ्याचसाठी तुझ्याचसाठी कुणीतरी झरत आहे
गच्च निळ्यां आभाळात एक नभ संरत आहे
मनाचा डोह होतो आठवणींनी चिंब
त्या मनाच्या डोहतही पुन्हा तुझेच प्रतीबिंब

डोळ्यांनी का होईना आता बोलुन् घे प्रिये
तुला शब्द सुचतील तेव्हा कुठे असेन कुणास् ठाऊक?
तुला सुर सापडेल असे काहीतरी आत्ताच कर
तुल शब्द सुचती ल तेव्हा असेन नसेन कुणास् ठाऊक?

तु आहेस म्हनुन माझ्या आयुष्याला आहे अर्थ,
तु नसशिल् तर् माझे जिवन आहे व्यर्थ .
मेघानवाचुन नभामध्ये पाणी कधी जमेल् काय् ?
तुला वजा केल्या नतर माझ्यासाठी जगात काही उरेल काय् ?

डोळ्यांमध्ये वादळ आणी ह्रुदयामध्ये घाव् आहे,
त्या घावाच्या पाठीमागे वेदनेचा एक् गाव आहे.
तिथली लाल गुलाबे पाहुन सर्व माणसे फसतात्,
प्रेमामध्ये ह्या पडुन सर्व भान् विसरतात्.

धूके दाटलेले उदास उदास

मंगेश पाडगांवकर

धूके दाटलेले उदास उदास
धूके दाटलेले उदास उदास
मला वेढीती हे तुझे सर्व भास ॥धृ.॥

उभी मूक झाडे, विरागी किनारा
झुरे अंतरी अन फिरे आर्त वारा
कुणी ही ना इथे दिसे आसपास ॥१॥

कुठे चालल्या या दिशाहीन वाटा
कुणा शोधिती या उदासीन लाटा
दिशांतून दाटे, तुझा एक ध्यास ॥२॥

क्षणी भास होतो, तुझे सूर येती
जीवा भारुनी हे असे दूर नेती
स्मृती सोबतीला असा हा प्रवास ॥३॥

प्रेमात पडतांना

प्रेमात पडतांना , तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं ,
तोंड दुखेपर्यंत बडबडतांना , हवं ते सांगायचं राहून गेलं .

ती हो म्हणेल की नाही म्हणेल की देईल ठेवून एक मुस्काटात,
हा अशुभ विचार करता -करता हवं ते घडायचं राहून गेलं .

नुसताच बघत बसे मी तिच्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये
तिच्या डोळ्यात स्वतःला शोधतांना माझ्याविना तिचं अडायचं राहून गेलं .

तिच्या ओढणीचा , खांद्याचा स्पर्श हवा- हवासा वाटतसे नेहमी,
सांगीन तिला कधीतरी म्हणतांना हा विषय काढायचं राहून गेलं .

प्रत्येक भेटीनंतर ती जातांना घालमेल जीवाची असह्य होई ,

त्या दिवशीही ती निघाली अन..... तिला अडवायचं राहून गेलं .....

कशी ही प्रीत

त्याच्या प्रेमाच्या सादेला मी रुकार दिला आणि सगळं आयुष्यच बदललं......!
सगळी दुनिया अचानक रंगीबेरंगी झाली.

अवचित भेट कशी रे घडली
ध्यानी मनीही नसताना
नकळत प्रीत कशी ही फुलली
गाफिल मन हे असताना

क्षणात बदले सारी दुनिया
गुलाब पखरण चोहीकडे
फुले पिसारा मनमोराचा
नर्तन त्याचे तुझ्यापुढे

एकांती मग उगाच हसणे
तुला आठवून उगीच झुरणे
स्वप्नामधल्या सहवासाने
पुन्हा पुन्हा ते पुलकित होणे

समय गुलाबी पंख पसरुनी
असाच अलगद विहरावा
चिंब भिजावे प्रीतसरींनी
मनात दरवळ पसरावा

राहीले ओठांवरी.....

बोलायचे काहीच होते
बोलले काहीतरी
ओठातले हे शब्द माझे
राहीले ओठांवरी

स्वप्नातली मुर्त तीही
राहीली स्वप्नांतरी
ओठातले हे शब्द माझे
राहीले ओठांवरी

साहवेना ही व्यथा तू
भेट ना रे क्षणभरी
ओठातले हे शब्द माझे
राहीले ओठांवरी

ऐक ना अखेर ही रे
चालले मी दुसर्‍या तीरी
ओठातले हे शब्द माझे

श्रावणधारा

माझ्या ह्या कवितेचं विवेक काजरेकरांनी एका छानशा गाण्यात परिवर्तन केलंय.
माझ्या कवितेचं बनलेलं हे पहिलंच गाणं.

श्रावणधारा

रंगत येती तरंगत येती
जलदांमधूनी धावत येती

श्रावणधारा, जलदाधारा
धुंद वादळी, कापीत वारा
बहरत येती, मोहरत येती
सप्त सूर ते छेडीत येती

लाटा धाडून सागर मग तो
आसूसून ही वाट पाहतो
सरीता वाहे भान हरपूनी
सवे तयाच्या मीलन पाही

इंद्रधनूच्या कमानीतूनी
घेई चुंबन वेडी अवनी
भारुन जाई सारी धरती
पावसास त्या घेऊन कवनी

नि:शब्द आता सारा परिसर
मृद्गंधाचा ओला गहिवर
आठवणी त्या व्याकुळ नयनी
ठेवूनी जाई रंगीत गगनी

हृदय पाखरु

तू नसतोस ना माझ्याजवळ तेव्हा माझं चित्तच नसतं रे था-यावर!

हृदय पाखरु

रुंजी घालती तुझ्या सयी रे, माझ्या या हृदयी
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही

तो जर असता आज इथे तर
तो जर नसता आज तिथे तर
जर तरच्या द्वंद्वात अडकले, खिन्न दिशा दाही
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही

मन लागेना कशात माझे
सूर तयाचा कानी वाजे
देहभान रे हरपून आता, वाट तुझी पाही
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही

धावत ये ना, मिठीत घे ना
तोडीत ये ना वृथा बंधना
माझी नव्हते कधीच मी रे, फ़क्त तुझी राही
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही

गूढ

खरंच........! गूढच म्हणायचं हे. हे पृथ्वीतलावरचं रहाटगाडगं कसं काय चालतं
हे एक मोठं कोडंच आहे. शास्त्रीय दृष्टीने प्रत्येक गोष्टीला कारणं असतील
सुद्धा. पण हे सगळं घडवणारा तो कोणी तरी आहे हे नक्की. प्रत्येक गोष्टीचं वळण
अगदी ठरलेलं...... आखून दिलेलं.

अजाण त्या कळीस तो
भमर कसा भेटतो
गूढ उकले ना परी
कितीही शोधिले जरी

जशी धरा आतूरते
गगनाच्या मीलना
जशी सरीता धावते
सागराच्या वळणा

कसे कुणी अनुसरीले
कुणी कुणा शिकवीले
प्रकृतीच्या आर्तक्याचे
चलन कुणी लाविले

काय शोधी तू मना
गुपीत का करी खुले
गूढ अंतरातले
कुणा कधी न सापडे

येशील कां?

सांग सख्या रे येशील का
स्वप्नात माझिया येशील का

वारा नांदी घेऊन आला
हसू गालावर खुलवून गेला
मिटूनी डोळे वाट पाहते, हरवूनी सकला येशील का

आसमंत तो धुंद जाहला
तुझ्याचसाठी व्याकुळ झाला
अलगद येऊनी, हळूच स्पर्शूनी, मोरपीस तू होशील का

रातराणीचा सुगंध आता
गात्रातून या वाहू लागला
मिठीत तुझिया विसरुनी सारे, बेहोश मला तू करशील का

या वेडीला काही ना कळे
तुझ्याविना ना काही उकले
एकदाच रे फ़क्त एकदा, माझा तू रे होशील का

परीसस्पर्श

तुझी आठवण येताच
खुलतं ओठावर हसू
मनातले भाव जणू
दाखवतात तसू तसू

लकाकतात रे ती
डोळ्यातली निरांजनं
अन पापण्या ही जपतात
ती प्रकाशाची स्पंदनं

उजळलेला मुखचंद्रमा
अधिकच होतो लाजरा
मनातले भाव बोलून
होतो कावराबावरा

जीवाची तगमग
वाढवते हुरहुर
तुझ्या आगमनाचे वेध
करतात मन आतूर

दिसताच तू रे मग
सुखावतात ही नेत्रं
परीसस्पर्शाने तुझ्या
उजळतात गात्रं

मी पण

माझे मी पण मी कधीच विसरले
सवे जेव्हा तुझ्या मी पहिल्यांदा बहरले

स्पर्शातून तुझ्या रे मोरपीस फुलले
मनातले तरंग सारे अधरांवर उमटले

सारं विश्व माझं व्यापून तू टाकलंस
मला मात्र पुरतं वेडं करुन सोडलंस

सूर्य, चंद्र, तारे, आकाश सारं काही तूच
हृदयातली छेडली जाणारी हर एक तार तूच

तुझ्यापासून सुरु आणि तुझ्यापर्यंतच सारं
वृथा आता माझ्यासाठी बाकी जग सारं

नव्हतास तू तेव्हा.......

मंतरलेली रात होती
तारकांची प्रणयी वरात होती

चंद्राची धुंद साथ होती
मौनाची नीरव साद होती

दिलात तुझी रे याद होती
सोबतीच्या तुझी आस होती

अनिवार अशी ती रात्र होती
फितूर सारी गात्रं होती

श्वासात आर्जवी ओढ होती
उरात हुरहुर गूढ होती

रात सरता सरत नव्हती
तुझ्याविना जणू व्याकुळ होती

नि:शब्द उसासे टाकीत होती
उष:काल ती मागत होती

वळवाचा पाऊस

अचानक आभाळ भरुन येतं
चोहोबाजूंनी कोसळू लागतं
तळाशी दडलेल्या आठवणी तरल होतात
कासावीस होऊन उचंबळून येतात

उधाणलेला समुद्र
बेछूट पिसाळलेला वारा
उठवतो मोहोळ आठवणींचे
पसरुन सैरावैरा

विचारांचं काहूर
घालतं मनात थैमान
कुरतडून टाकतं काळीज
होऊन दुष्ट सैतान

काहीतरी करायचं राहून गेलेलं
खूपसं उपभोगायचं विसरुन गेलेलं
हातातून वेळ निसटून गेलेली
अपुरेपणाची जाणीव देऊन गेलेली

आभाळ निरभ्र झाल्यावर
स्व्च्छ प्रकाशाची कवाडं उघडल्यावर
आरंभ होईल नव्या दिवसाचा
तृप्तीचं तेज ल्यालेल्या एका नव्या आयुष्याचा

तुझ्याविना

का रे इतकी बंधनं हवीत ह्या जगाची? कां मनाला हवं तसं जगता येऊ नये? नाही रे
जगता येत तुझ्याशिवाय!!

माझं अस्तित्व तुझ्याशिवाय
एक मोठं शून्य
जगातलं सारं काही व्यर्थ
तुझ्याशिवाय अन्य

जाणीव होताच ह्याची मला
कासावीस होतो जीव
तुझ्याविना माझ्या जगण्याची
मलाच येते कीव

कसली ती तगमग
कसली ती तडफ़ड
तुझ्याविना जगण्याची
कशासाठी ही धडपड

उधळून द्यावी सारी
बंधने वाटे आज
भिरकावून द्यावी ती
पांघरलेली लाज

धावत तुझ्याकडे येऊन
मनसोक्त रडून
सारं काही करावं मोकळं
कुशीत तुझ्या शिरुन.

प्रेमसमर

जयश्री

पाहू नकोस ना रे
मजसी असा गडे तू
मी विरघळून जाते
समजून घे जरा तू

आमंत्रणे तुझी ती
नजरेतूनीच येती
नि:शब्द आर्जवे ती
डोळेच व्यक्त करीती

करी पाठलाग माझा
मिश्कील भाव त्याचे
हळुवार सोडती ते
शर प्रेमबंधनाचे

लटका विरोध आता
किती वेळ भासवू मी
ओढाळ ह्या मनाला
किती वेळ थांबवू मी

तू जिंकलास जानू
हरले तुझी प्रिया मी
समरात ह्या मनाच्या
हरुनीही जिंकले मी

तुझे श्वास

श्वास तुझे ते मला दिलेले
संपत आले रे
कासावीस हा जीव होतसे
त्याविण माझा रे

श्वासांच्या त्या हिंदोळ्यांवर
झुलते मी ही तुझ्यासवे
स्पंदनात त्या अनुभवते मी
तुझ्या छबीचे रंग नवे

हळुवार त्या निश्वासांच्या
गोड गुलाबी स्पर्शाने
लाली चढते गो-या गाली
नकळत कशी ही लज्जेने

उमले ओठी हास्य चोरटे
आठवून त्या गुजगोष्टी
काटा फुलतो अंगावरती
तुझीच स्मरुनी गोड मिठी

रिती जाहले आहे पुरती
विना तुझ्या त्या श्वासांनी
दे ना आता श्वास नवे ते
घेऊनी मजसी तव कवनी

मुखवटे आणि चेहरे

किती मुखवटे, किती चेहरे
किती खोटे, किती खरे
प्रयत्न केला शोधायचा जर
भीषण सत्य येईल समोर
त्या सत्याला सामोरं कधी जाता येईल का?

रोज भेटणारे, बेगडी हसणारे
भेटल्यावर ओढून ताणून तारीफ़ करणारे
कसे ओळखायचे कोण आपले
कसे ओळखायचे मित्र यातले
मोजण्यासाठी काही परिमाण आहे का?

कुणाचा जीव तुटतो आपल्यासाठी
कोण हळहळतो आपल्या दु:खासाठी
खोटा कळवळा कोण दाखवतो
संकट येता कोण पाठ फ़िरवतो
कधी खरं खरं आपल्याला कळेल का?

कशाला हवेत हे जमाखर्च....
कशाला हवेत हे तर्ककुतर्क
समोर येईल त्याला म्हणावा आपला
बाकी सोडून द्यावा देवावर हवाला
असं काहीसं करता येईल का?

नाही देता आला पैसा जरी
द्यावा निर्भेळ आनंद परी
जीवन आपलं अमूल्य समजून
फुलवत जावं हास्य पसरुन
असं हसणारं फुल कधी बनता येईल का?