Saturday, November 18, 2006

मटणाचा खिमा



वाढणी: ६-७ जणांसाठी.

पाककृतीला लागणारा वेळ: १५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस



  • १/२ किलो मटण खिमा

  • २ मध्यम आकाराचे कांदे, १ टोमॅटो

  • १ टी स्पून काश्मिरी मिरचीचे लालबुंद तिखट

  • १/२ टी स्पून हळद

  • १ टेबल स्पून आख्खे धणे

  • १/२ टेबल स्पून आख्खे जिरे

  • १० नग काळी मिरी

  • ७ नग लवंग

  • ४-५ नग हिरवी वेलची

  • २" दालचिनीचे तुकडे

  • १ टी स्पून बडीशोप

  • १/२ फुल बाद्यान

  • १ टेबलस्पून आलं लसूण पेस्ट

  • १ लिंबू

  • मीठ चवीनुसार

  • १/२ वाटी वनस्पती तुप

  • १ टी स्पून कसूरी मेथी पावडर

  • २ अंडी

  • कोथिंबीर जरा जास्तच.


क्रमवार मार्गदर्शन: खिमा धुवून पिळून घ्यावा.
कांदे बारीक चिरून घ्यावेत. टोमॅटोही बारीक चिरुन घ्यावा. दोन्ही, भेळेसाठी चिरतात त्या प्रमाणे, चौकोनी आणि एकदम बारीक चिरावेत. धणे, जिरे, मिरी, लवंग, वेलची, दालचिनी, बडीशोप, बाद्यान मंद आंचेवर भाजून घ्यावेत. एका ताटलीत काढून पूर्णपणे थंड होऊ द्यावेत. थंड झाल्यावर मिक्सरवर बारीक (वस्त्रगाळ) दळून घ्यावेत. लिंबाचा रस काढून ठेवावा. अंडी उकडून त्यांच्या उभ्या, चार-चार, फोडी करून ठेवाव्यात. कोथिंबीर बारीक चिरून ठेवावी. खिम्याला तिखट, हळद, वरील दळलेला गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, लिंबूरस आणि मीठ लावून सर्व नीट मिसळून ठेवावे. खिमा अर्धा तास मुरण्यास ठेवून द्यावा. अर्ध्या तासा नंतर, जाड बुडाच्या पातेल्यात (किंवा कढईत) तुप गरम करावे. तुप गरम झाले की त्यात कांदा लालसर रंगावर परतून घ्यावा. कांदा परतला की टोमॅटो टाकून परतावा. टोमॅटो शिजून एकजीव झाला, तुप सुटले की, खिमा टाकून परतावा. अगदी अर्धीवाटी पाणी टाकून पुन्हा नीट मिसळून झाकून, अगदी मंद आंचेवर शिजवावा. शिजल्यावर, जर पाण्याचा अंश अजून असेल तर, झाकण न ठेवता मध्यम आंचेवर पाणी आटवून टाकावे. तुपाचा तवंग दिसला पाहीजे. खिमा जळणार नाही ह्याची काळजी घ्यावी. वरून कसूरी मेथी पावडर, अर्धी कोथिंबीर घालून मिसळून घ्यावे. शेवटी अंडी घालून हलक्या हाताने मिसळावे.


काचेच्या वाडग्यात (सर्व्हींग बाऊल) काढून वरून उरलेली कोथिंबीर भुरभुरावी.


शुभेच्छा....!


माहितीचा स्रोत: निरिक्षण आणि स्वानुभव.


अधिक टीपा: खिमा बाहेरून आणल्यावर किंचित कोमट पाण्यात घालून ठेवावा. त्यामुळे त्यातील चरबी सुटून वर तरंगते ती काढून टाकता येते. चरबीची चव आवडत असेल तर ठेवायला हरकत नाही. पण खिमा धुवावा जरूर. (अशा वेळी थंड पाण्यात घालून लगेच धुवून घ्यावा म्हणजे चरबी वाहून जात नाही.)


खिम्यात मटार, बटाटे, भोपळी मिरची वगैरे सर्व किंवा ह्यातील एखादी भाजीही घालतात. (मटार, बटाटे उकडून घालावेत.)


अंडी नाही घातली तरी चालतात. पण, घातल्यास दिसतात छान. अंडी खिम्यात न मिसळता, खिमा काचेच्या वाडग्यात काढल्यावर सर्वात वर, फुला प्रमाणे, सजविल्यासही सुंदर दिसतात.


काचेच्या वाडग्यात अगदी जेवायच्या आधी खिमा काढून सजवावा. कोथिंबीर हिरवीगाऽऽर असावी. कोथिंबीर घातल्यावर झाकण ठेवून नये. (मलूल पडते आणि रंग उतरतो.)



पालक पराठा



वाढणी: २-३

पाककृतीला लागणारा वेळ: १५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस



  • एक जुडी पालक

  • छोटा कांदा

  • लसूण पाकळ्या-२ किंवा ३

  • धणे-जीरे पुड २ चमचे

  • चवीनुसार हिरवी मिर्ची , मिठ

  • हिंग,ओवा- अर्धा चमचा

  • अद्र्क

  • ३ पराठ्याला पुरेल गव्हाचे पीठ(पालक टाकल्या मुळे ४ होतील)

  • पराठे भाजण्यासाठी तेल किंवा तुप

  • पाणी- अर्धा कप


क्रमवार मार्गदर्शन: पालक धुवुन घ्यावा,अर्धा कांदा चिरुन घ्यावा, उकळत्या पाण्यात पालक-कांदा ३-४ मिनीट ठेवावा, पाणी गाळुन पालक-कांदा वेगळा करावा. यामुळे पालक कच्चा राहणार नाही व कांद्याचा उग्रपणा जाईल. मिक्सर मधुन पालक,कांदा,अद्रक,लसूण,हिरवी मिर्ची,धणे-जीरे पुड, हिंग,ओवा,मीठ,पाणी घालुन बारिक पेस्ट बनवावी. हि पेस्ट गव्हाच्या पीठात मिसळुन कणिक मळावी. हि कणिक अर्थातच हिरवी होईल. खाली दिलेल्या चित्राप्रमाणे पहिल्या स्टेप मध्ये कणकेचा एक छोटा गोळा गोलाकार लाटावे,त्यावर तुप लावुन,पीठ भुरकावे, व नंबर २ च्या चित्राप्रमाणे चाकुने एक कट देवुन कोन बनवावा(नंबर ३). हा कोन दाबुन चपटा बनवल्यावर(नंबर ४ सारखा दिसेल) गोलाकार परोठा लाटुन तव्यावर तुप लावुन भाजावा. यामुळे पराठ्यांना खुप (गोलाकार)पदर सुटतात.



चित्र:



माहितीचा स्रोत: माझी ताई सौ. अलका


अधिक टीपा: याप्रकारे साधे किंवा, मेथीचे किंवा कोणतेही पराठे छान होतात.



सुकलेली फुलं..


ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही


तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन


चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत


मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो


पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही


मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं


काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही


ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं


कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!..


हवीस तू


स्वप्नातील गोड भास
सत्यातील आस तू
हवीस तू.... हवीस तू


मोहक तू लडीवाळ
मिश्कील आणि खट्याळ
बोल तुझे किती मधाळ
सत्य असून स्वप्न तू
हवीस तू...हवीस तू


गझल तूच नटलेली
सूरात चिंब भिजलेली
हृदयातील श्वासांची
सूरेल एक तान तू
हवीस तू... हवीस तू


स्पर्श तुझा लाजरा
श्वास तुझा मोगरा
पाहूनी तुझ्या अदा
कूस बदलती ऋतू
हवीस तू... हवीस तू


मस्तानी........


प्रत्येकाच्या मनात एक मस्तानी असते
अरे हळु ही गोष्ट फ़क्त स्वतःशी बोलयची असते
लग्नाची असली तरी ती फ़क्त बायको असते
आपली मस्तानी कोणालाच सांगायची नसते


लोक म्हणतात हा व्यभिचार आहे
जाणुन बुजुन केलेला अविचार आहे


बोलणारे लोक खोटारडे असतात
स्वतःपासुन सुद्धा काहीतरी लपवतात
करतील काय सगळेच बाजीराव नसतात


लोक नेहेमी असेच वागतात
बाजीरावाचे प्रेम ग्रेट म्हणतात
तुमच्या आमच्या चारित्र्यावर चिखल उडवतात
येता जाता नैतिकतेचे डोस पाजतात


बालपणी मस्तानी एक परी असते
तारुणा‌ईच पहिल प्रेम असते
वय वाढल्यावर सखी असाते
काहीही म्हणा प्रत्येकाच्या मनात असते


प्रत्येकाला ठा‌उक असते मस्तानी आपली होणार नाही
सगळ्यांचे नशिब काही तेवढे थोर नाही
तरीही आपली मस्तानी जपायची असते
मनाच्या कप्प्यात खोल खोल दडवायची असते


हिवाळा


न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा


डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती


गंजदार पांढर्या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्या शांततेचा निशिगंध


या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा


The Don च प्रेम


ए तिला कशाला सान्गितल की माझ तिच्यावर प्रेम आहे
आता तिच्या बापाला कळल तर फ़ुकट माझ्यावर गेम आहे


साला सान्गितल कोणी तुम्हाला आगाउपणा करायला
माझा टाका भिडत असताना मधे तन्गड्या घालायला
उगा शानपत्ती करू नका
नाजुक आपल प्रेम आहे
काही झाल तरी शेवटी आपल्यावरच गेम आहे


तस तिच्या बापाला काय आपण मरणाला भीत नाही
प्रेमात साला मरायच तर प्रेमाचा काय उपयोग नाही
तुम्ही घाबरून प्रेम केलत... तुमच्या प्रेमावर शेम आहे
आणि काही झाल तरी शेवटी आपल्यावरच गेम आहे


महित आहे या...र ती आपल्याला भाव देत नाही
पण प्रेम केलय तिच्यावर बघतोच कशी ऐकत नाही
ती अशी ऐकायची नाही कारण ती मोठी मेम आहे
म्हणूनच म्हणतो या...र शेवटी आपल्यावरच गेम आहे


तो शेजारच्या गल्लीतला भाई तिच्यावर टप्पे टाकतो
एकदा त्याला आपल्या गल्लीत येऊदे बघाच त्याला कसा झापतो
जाऊ देना !! ती पण त्याला भीक देत नाही
त्याची पण कन्डीशन सेम आहे
तरी पण आपल्याला वटत शेवटी आपल्यावरच गेम आहे


आरे अप्सरा पण फ़िक्या पडतील असा रापचीक आपला माल आहे
पहाल जर तुम्ही पण म्हणाल "ये तो कुदरत का कमाल हे"
कभी इधर तो कभी उधर या चिकन्या पोरीचा काय नेम आहे
म्हणून तर आपण म्हणतो शेवटी आपल्यावरच गेम आहे


आपल्याला पण सेटल व्हायचय या...र पण ही पोरगी काय पटत नाय
आपण पण फ़ेव्हीकोल लवून बसलोय साला आपण काय हटत नाय
आपल्या लव्ह लाईफ़ मध्येच लोच्या बाकी सार क्षेम आहे
आता तरी कळल ना!!!! शेवटी आपल्यावरच गेम आहे
शेवटी आपल्यावरच गेम आहे


ती


एकदा ती माझ्याकडे आली
माझ्याबरोबर 'चल' म्हणाली,
'हो' म्हणायच्या आतंच ती
देऊन हात, घेऊन गेली


होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळसर नव्हती संपत
नभी चांदणे, चंद्रासंगत


गोड गप्पा नव्हत्या थांबत
सुरेल आवाज जणू कोकिळेगत
मौनामधे भासे दिव्य एक रंगत
अनवट सूर, बासरीचे उमलत


हसताना ती बाहुली दिसायची
बारीक डोळे अलगद लाजायची,
गालांवर खळी नाजुक पडायची
नयन शिंपल्यात, जपावी वाटायची


तरूतळी एका आम्ही बसलो
मनीचे सारे तिला मी वदलो,
हात थरथरता तिच्या हातात
परि नजर थेट डोळ्यात


काय झालं पूढे सांगत नाही
स्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी,
प्रेमामधे तर पडलो नाही !


Friday, November 17, 2006

प्रेमाला उपमा नाही ।।


प्रेमाला उपमा नाही ।।
उपम्यात साखर नाही ।
साखरेला ऊस नाही ।
ऊसाला पाणी नाही ।
पाण्याला पंप नाही ।
पंपाला वीज नाही ।
वीजेला पैसा नाही ।
पैशाला काम नाही ।
कामाला नोकरी नाही ।
नोकरीला पदवी नाही ।
पदवीला कॉलेज नाही ।
कॉलेजला पोरी नाही ।
पोरीला प्रेम नाही ।
प्रेमाला उपमा नाही ।।

कठीण


तू घाव घातले अन
जगणे कठीण झाले.
डोळ्यात आसवांचे
लपणे कठीण झाले.


केले मनास माझ्या
त्यांनीच जायबंदी
बंदिस्त पाखराला
उडणे कठीण झाले.


होऊन शुर योद्धा
जग जिंकण्या निघालो
मज सोबत्याविरोधी
लढणे कठीण झाले.


विसरुन पार गेलो
आनंद जिंदगीचा
आता सुखा तुझ्याशी
जमणे कठीण झाले.


स्वप्नातली कळी तू
मी दोस्त यातनांचा
येथे तुझे न माझे
जुळणे कठीण झाले.


जाणार तर जा जाणार तर जा....


जाणार तर जा जाणार तर जा....
ह्रुदयात तुझ्या थोडी जागा मला देऊन जा
जाणार तर ....
श्वासात तुझ्या मिसळुन माझे श्वास दोन घेऊन जा
जाणार तर ....
नयनी माझ्या तुझी प्रतिमा तेवढी ठेऊन जा
जाणार तर ....
चाफ्याच्या गंधात मिसळुन गंध माझा घेऊन जा
जाणार तर ....
माझ्यातुन मला घेऊन तुला तेवढं ठेऊन जा
जाणार तर ....


झाड



एकदा
मध्यरात्रीच्या नीरवेतून
मी ऐकला होता एक भयानक चीत्कार
पलिकडच्या परसात असलेल्या
एका वृक्षाच्या काळ्याशार पानघुटमटातून
उफ़ाळलेला.

कोणत्या तरी पक्षाची प्राणान्तिक किंकाळी
जी फ़ोडीत गेली दहा दिशांच्या
तटस्थ तावदानी काचा,
भ्रमिष्टपणाने धावली सैरावैरा अंतराळात
आणि कोसळली पुन्हा
चेंदामेंदा होऊन
त्याच वृक्षाच्या फ़ांद्यांतून साचलेल्या
काळोखाच्या तळ्यामध्ये.

नंतर त्या किंकाळीला फ़ुटत होते धुमारे
चिणलेल्या पण तीव्र स्वरांचे,
रात्रीच्या केसाळ काजळी त्वचेमध्ये
घुसत होते अनकुचीदार झटके
फ़ांद्यांतून फ़ुटणार्‍या अपस्मारांचे.

सार्‍या जगाबरोबर झोपी गेलेले ते झाड
अकस्मात झाले होते जागे
कोठल्या तरी दानवी अत्याचाराने,
आणि झाले होते स्वतःच
एक अगतिक वेदनेचे वारूळ
पृथ्वीच्या छातीतून उमाळलेले
आणि शृतिहीन आकाशाला
हाक मारणारे.
देव जाणे काय घडले असेल
त्या पानांच्या दुनियेमध्ये.
आले असेल एखादे जहर काळे रानमांजर
अमावास्येच्या योनीतून बाहेर सरपटलेले
क्रूर चमकत्या नजरेतून ठिणग्यांचे बुंद डाळणारे
एका फ़ांदीवरुन दुसर्‍या फ़ांदीवर
ललसत्या नखाळ पंजांनी चडणारे.

त्याने अचानक अखेरच्या तळावरुन
घेतली असेल उशी टाकली असेल झेप
उषःकालाचे राजवर्खी स्वप्न पाहणार्‍या
एखाद्या निद्रिस्त
गोजिरवाण्या पाखरावर.

मृत्यूच्या करवती दातांत जागृत झालेल्या
त्या पाखराने
फ़ोडली असेल पहिली भीषण किंकाळी
आणि तुकड्यातुकड्याने शरीर फ़ुटत असताना
घातल्या असतील त्या व्याकूळ विझणार्‍या हाका
भोवतालच्या विश्वाला.

नसेल रानमांजर असेल कदाचित घुबडही
असेल कदाचित एखादा अजगरी सर्प
कृतान्ताचे विळखे घालीत बुंध्यावरुन सरकणारा,
असेल काहीही;

पक्षा-ऐवजी कुरतडली गेली असतील
कदाचित त्याची पिलेही,
पण एक खरे की त्या दहा मिनिटांच्या काळात
परिसरातील एकाही वृक्षाचे
एकही पान हालले नाही,
काहीही शहारले नाही, काहीही उसासले नाही
क्षणार्धात झाले पुन्हा सारीकडे
शांत्--शांत!

दूर झालो मी खिडकीपासून
पुन्हा मोठा केला रेडियोचा मंदावलेला गाज
आणि शिलगावला मेजावरचा दिवा.
कोठल्या तरी केंद्रातील विलायती संगीताच्या
इंद्रमहिरापी उभ्या राहिल्या
माझ्या खोलीतील विषण्ण हवेवर,
आणि प्रकाशाच्या सोनेरी रेषांनी
त्यांना मिठी मारली
माहेरवासी अधीरतेने;
सावल्यात साखळेल्या भिंती मुक्त झाल

पर्याय नाही............



पर्याय नाही............
पर्याय नाही............

जगणं म्हणजे फसवणूक, पण फसण्याशिवाय पर्याय नाही
येवढच आपल्या हाती आहे, हसण्याशिवाय पर्याय नाही

आयुष्याच्या पाटीवरच्या सगळ्याच ओळी ख-या नसतात
कितीही आवडो, काही ओळी पुसण्याशिवाय पर्याय नाही

जे काय चाललं आहे त्याने असह्य संताप येतो तरी
मन मारून, हात बांधून बसण्याशिवाय पर्याय नाही

माणूस म्हणून जन्मलो खरं, पण माणसं काही दिसत नाहीत
कलेवरांच्या ढिगा-यात आता, घुसण्याशिवाय पर्याय नाही

आलोच नसतो तर कदाचित वेगळं काही घडलं असतं
आलोच आहे तर आता या "असण्या"शिवाय पर्याय नाही

कँटीन मधला चहा आणि



कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव !

कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !

बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !

परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !

पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.

अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!

पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती !!!!!!

जमलंच नाही ..!



जमलंच नाही ..!
जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...

रोज संध्याकाळी तिला चौपाटीवर फिरवायला ,
तिच्या निळ्या डोळ्यांत स्वतःला हरवायला ,

वाळूत बंगला बांधता बांधता..
आलं असतं मनातलं सांगता..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं..

कधीतरी तिच्यासोबत बागेमध्ये जायला ,
एकच कॅडबरी दोघांमधे वाटून खायला ,

कधी खोडी काढली असती..
आणखी गोडी वाढली असती..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...
तिचा हात हळुवारपणे आपल्या हातात घ्यायला ,
लता-रफ़ी, किशोर-आशा ड्युएट गाणं गायला ,

सूर कदाचित जुळले असते..
तिला मनातले कळले असते..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...

निघताच निघता तिला बावरलेलं पाहायला ,
मला तिची ,तिला माझी शपथ वाहायला ,

माझे अश्रू माझ्या डोळ्यांत लपले असते..
तिचे मात्र दवासारखे जपले असते..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही



मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

आज इथे उद्या तिथे......... कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,

म्हणुन....................म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

शिवा पाहिजे ॥


अंधार होत चाललाय
दिवा पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

नेते झाले अफ़जलखान
काश्मिरचे झाले स्मशान।
शायिस्तेखानची बोटे तोडण्यास
युवा पाहिजे।
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

मराठे झाले यौवनभक्त
मराठ्यांच्याच तलवारीवर
मराठ्यांचेच रक्त
पुन्हा एकदा रायगडावर
मराठ्यांचा दावा पाहिजे
हर हर महादेव 'हवा' पाहिजे
'हवा' पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे


वाचायचे जाते राहून....


पत्र लिहि, पण नको पाठवू,

शाईमधूनी काजळ गहिरे...

लिपिरेषांच्या जाळीमधूनी,

नको पाठवू हसू लाजरे...


चढण लाडकी भिवयिमधली,

नको पाठवू वेलांटितून...

नको पाठ्वू तीळ गालिचा,

पुर्णविरामांच्या बिंदूतुन...


नको पाठवू अक्षरांतुनी,

शब्दांमधले अधिरे स्पंदन...

कागदातूनी नको पाठवू,

स्पर्शामधला कंप विलक्षण...


नको पाठवू वीज सुवासिक,

उलगडणारी घडीघडीतून...

नको पाठवू असे कितिदा,

सांगितले मी: तू हट्टी पण...


पाठविशी ते सगळे सगळे,

पहिल्या ओळीमधेच मिळते...

पत्रच पुढचे त्यानंतर पण,

वाचायचे जाते राहून....

--- इंदिरा संत

छातीत निर्भय श्वास दे


छातीत निर्भय श्वास दे,
साथीस कणखर हात दे।
फुत्कारणार्‍या संकटांना
ठेचणारे पाय दे ।।

ध्येय दे उत्तुंग मंगल
अढळ कैलासापरी ।
कारुण्य निर्मळ वाहू दे
हृदयातून गंगेपरी ।।

दीनदुबळ्या रक्षणा रे,
शस्त्र दे माझ्या करी ।
दु:शासनाच्या दानवी
रुधिरांत धरती न्हाऊ दे।।

निष्पाप जे ते रुप तुझे
उमजूं दे माझे मला ।
धर्म, जाती, पन्थ याच्या
तोड आता श्रुंखला ।।

नवीन गगने, नवीन दिनकर,
नवीन चंद्राच्या कला,
या नव्या विश्वात तुझ्या
न्याय नीती नांदू दे ।।

छातीत निर्भय श्वास दे...


नाते अपुले



आज अचानक भल्या पहाटे
एक आठवण जागवून गेली
तुझे आणि माझे बंध
आपसूकच दाखवून गेली

सांग ना !
काय तुझे आणि माझे नाते
उमजेल का, कधी मला ते

करून करून विचार जेव्हा
कधी नव्हे ते थकलो
गालांवरचा पाऊस मी
थांबवू नाही शकलो

मॆत्रीचे हे नाते अपुले
का आज एकतर्फी वाटले
पहाटेच्या या ऒल्या शणी
का कातरवेळ्चे ध्यास लागले

का तुझ्या डोळ्यात आज
शोधतोय मी पाऊस गाणे
धुक्याच्या या ओंजळीमध्ये
प्रेमरूपी दव थेंब माझे

सापडेल का या शणांना
कधी एक गोड किनारा
गालांवरच्या पावसाला
सावरणारा एक जिव्हाळा
सावरणारा एक जिव्हाळा

प्रेमाचं BEVERAGE "



प्रेमाचं BEVERAGE

CENTRAL NERVOUS SYSTEM माझी केलीस तु DAMAGE,
बदलुन टाकलीस तु माझी भोळीभाबडी IMAGE

कशाचीच नव्हती एवढी आता आहे तुझी CRAZE
आयुष्याचा माझ्या चालु आहे हा SENSITIVE PHASE

कुठेही पाहता दिसे मज फक्त तुझीच IMAGE
बोलायला तुझ्याशी आणतो मी उसनं COURAGE

तुझे प्रेम म्हणजे एक ALCOHOLIC BEVERAGE
सुंदर रंगीत पक्ष्याचे मखमली PLUMAGE

VALENTINE'S DAYला देशील म्हटलं सुंदरसं PACKAGE
नाही मिळालं काही तेव्हा र्žह्रुदयास लावले BANDAGE

तुझ्यानंतर होणार नाही प्रिये कोणाशी ENGAGE
माझ्यासाठी रिता ठेव तुझ्या र्žह्रुदयाचा PASSAGE


नाही माझा मोठा बंगला आहे छोटं COTTAGE
प्रेमामाखातर करशील का तू त्यामध्ये MANAGE

चटकन दे होकर आणि भर आयुष्याचं PAGE
विलंब करु नकोस राणी होईल आमचं AGE....होईल आमचं AGE...

वाचणारा कोणी असेल तर




वाचणारा कोणी असेल तर
मेल फ़ोरवर्ड करण्यात अर्थ आहे.
मेल उघणाराही कोणी नसेल तर
व्हायरस पाठ्वणेही व्यर्थ आहे.

आलेले मेल कधी तरी वाचल्याचे सारखे भास होत असतात.
आपले मेल आपल्यालाच परत मिळत असतात.

नविन मेल आहे कळल्यावर
माझ्या जीवात जीव आला होता
स्पाम आहे कळाल्यावर
मीच त्याचा जीव घेतला होता

मी आहेच असा वेगळा एकटा एकटा राहणारा
स्पाम मेल सूदधा तन्मयतेने पाठवाणारा :))

माज्या प्रत्येक फ़ोरवर्ड मागे
तुमच्या शिव्याचा मार आहे
पण तुमच्या आठ्वणीचा
हाच एक आधार आहे

एक काळ होता, सारखे फ़ोरवर्ड येत असे,
मला हि हसण्याचे कारण मिळत असे,
पण पब्लिकने रिप्लाय फ़ोरवर्डच बन्द केले आहे,
मित्रा पेक्षा बेन्ड्वीड्थ महत्वाची ठरली आहे

प्रत्येक सुरुवातीला अन्त आहे
हे मेल डिलीट होण्याची मला खन्त आहे
आता तरी रिप्लाय फ़ोरवर्ड येतील अशी अपेक्षा आहे
माझ्या मेलची कठिण परिक्षा आहे

आमचे देशप्रेम सरले का???



आमचे देशप्रेम सरले का???

शंडांची अवलाद....
कधी बदलणार नाही.
किती ही स्फोट झाले तरी..
आम्ही सुधारणार नाही.

घरात घुसुन शेजारी
आमची मुलेबाळे मारणार.
आम्ही मात्र भारत-पाक
मैत्रिचे पुल बांधणार
.
मेरा भारत महान..
मेरा भारत महान.
मुलायमचा लाडके..
सिमी अन पाकिस्तान.

वाटते कधी तरी मनाला,
मी ही अतिरेकी बनावे.
माझ्या हातुनही शेजाऱ्याचे,
पार्लमेंट हाऊस उडावे.

त्यांचा असेल जिहाद..???
आमचे धर्मयुद्ध कुठे???
स्वत:ला पुरुष म्हणवणारे.
सगळे झोपले कुठे???

त्यांनी मारायचे..आम्ही बघायचे
इतकेच हाती उरले का?????
शेजाऱ्यावर प्रेम करता करता
आमचे देशप्रेम सरले का???
आमचे देशप्रेम सरले का???

आयुष्याच्या अल्बममध्ये



आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.

आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.

भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचणसुध्धा जमल पाहिजे.

गीतेच रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे.

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.

द्यायला कोनी नसल
म्हणुन काय झाल?
एक गजरा विकत घ्या
ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या.

रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी
Thanks नुसत म्हणा!

Wednesday, November 15, 2006

प्रेम करायचं राहुन गेलं.


पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अद्यास,अद्यास आणि अद्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे आयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
प्रत्येक वेळा समोरच्यांच्या दावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन..
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!... पण ते कधी कळालचं नाही..
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
हल्ली पवईलेकवरच्या प्रेमीयुगुलांना पहातोना. जीव खुप जळतो रे.. शपथ..
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
नंतर विचार करतो अजुन लग्नाला दोन वर्षे आहेतं खुप वेळ आहे! अजुन वेळ गेलेली नाही मित्रा. काही तरी कर
पण काय करु कुणी मला प्रपोज करतच नाही !!!!!


पुणे बोललं तेव्हा




पुणे बोललं तेव्हा
आज मला बोललंच पाहिजे
बोलूनही काही झालं नाही तर ओरडलंच पाहिजे
पुण्यात काय उणे ?
ते स्वतःचं सांगितले पाहिजे.


बिहार, युपी दिल्ली इथे घुसले आहेत
स्वतःचे असे माझे सगळे रुसले आहेत
आज इथले सारे कट्टे मोकळे आहेत
आई बाबा बागेत फिरताना एकले आहेत


महाराज, बाजीराव पासून बऱ्याचं नंतर
गोखले, आगरकर, टिळक पर्यंतचे अंतर
महापुरुषांची जागा ओसाड आता पडली आहे
गल्ली बोळ मात्र, राजकारणी कोल्हया कुत्र्यानं भरली आहेत


बंगलोर नक्कीच जास्ती थंड आहे
मुंबई पेक्षा इथला धंदा मंद आहे
हैद्राबाद्च्य्या तर रस्त्यांची ही बरकत आहे
इथे मात्र चालतानाही तुमची कसरत आहे


पण सोडून मला म्हणून जाऊ नका रे !
पुणेकरांनो ! उठा रे ! पुणे तिथे काय उणे ते सार्थ करा रे !
"silicon valley " इथेच बनवा , "detroit" पण इथेच घडवा,
MIT, Harvard हून परत या ... इथेच विद्येच एक मंदिर बनवा


चला आता जागे व्हा !!
इतिहास परत घडवायचा आहे
सोन्याच्या नांगर घेऊन
बाविसाव्या शतकातलं पुणं नांगरायचं आहे !! """"
..........


Aiport वर उतरताच , कोणीतरी मला खुणावतं होत
पाहिलं तर चक्क पुणे माझ्याशी बोलत होत
बोलत कसलं निष्कारणं ओरडतच होत
माझ्यातल्या मेलेल्या पुणेकराला आव्हान देत होत.


आव्हानां वर त्याच्या मी भित्रा मनात हसलो,
शेवटी पुण्यालाच पाठ दाखवून मी तसाच फिरलो,
म्हणालो : स्वप्न इथल्या होणार सगळ्यांची साकार,
पुणे मात्र असच वेदनांनी जळत राहणार.


हरलेल्या मनात एक विचार येऊनही
मी नाही बोललो काही
एकदाच वळून सांगावंसं वाटलं पुण्याला
"धीर धर : हि फक्त तात्पुरती माघार आहे, अंतिम शरणागती नाही"




देव


देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई
देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आदाळी सागरी, देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही, देव सर्वादूतां दायी
देव मुदीत ना मावे, तीथर्क्षेत्रात ना दावे
देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे
तुझ्या माझ्या जड देही देव दरुनिया राही
देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत
देव सगुण, निर्गुण, देव विश्वाचे कारण
काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही