Tuesday, July 10, 2007

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेल !!

-कुसूमाग्रज.

पुरे झाले सुर्य चंद्र, पुरे झाल्या तारा,
पुरे झाले नदीनाले, पुरे झाला वारा
जाळासारखा नजरेमध्ये नजर बांधून पहा,
सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा
शेवाळलेले शब्द अन यमक छंद करतील काय?
डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?
शेवाळलेले शब्द अन यमक छंद करतील काय?
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापुर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुध्दा आभाळात पोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस,
बुरुजावरती झेंड्या सारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेल!